दिनमान प्रतिनिधी
श्रीनगर|
महाराष्ट्र आणि काश्मीरच्या मैत्रीचे नवे पर्व सुरू झाले आहे. काश्मीरच्या तरुणांसाठी सरहद संस्था करीत असलेले कार्य मोलाचे असून, या तरुणांच्या प्रगतीसाठी आवश्यक तेे सर्व पाठबळ दिले जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी येथे सांगितले.
पुणे येथील मसरहद संस्थेमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७३व्या वाढदिवसानिमित्त विविधतेतील एकतेला सलाम करणार्या ‘हम सब एक हैं’ या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, सरहद संस्थेचे संजय नहार आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात अमरनाथ यात्रा तसेच कोविडकाळात सामाजिक कार्यात योगदान देणार्या विविध क्षेत्रांतील ७३ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. या नागरिकांना वन इंडिया रिंगने सन्मानित करण्यात आले.
मुख्यमंत्री शिंदे यांनी काश्मीरशी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे दृढ ॠणानुबंध होते, याचा आवर्जून उल्लेख केला. ते म्हणाले, की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने महाराष्ट्र आणि काश्मीरच्या मैत्रीचा नवा अध्याय सुरू होत आहे. सरहद या संस्थेच्या माध्यमातून आपले जुने नाते आणखी मजबूत करण्याचा हा उपक्रम आहे. सरहद संस्थेने मानवतेच्या क्षेत्रात आगळे काम केले आहे.
या वेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी पनवेल येथे काश्मीर नागरिकांसाठी दिलेल्या जमिनीच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य देण्यात येईल, अशी ग्वाही दिली. तसेच काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी नायब राज्यपाल सिन्हा यांनी तात्काळ प्रतिसाद दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले. या वेळी नायब राज्यपाल सिन्हा यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना तात्काळ प्रतिसाद दिला. आपण येत्या नवरात्रोत्सवात काश्मीर दौर्यावर याल त्या वेळी या महाराष्ट्र भवनच्या इमारतीचे भूमिपूजन केले जाईल. त्यासाठी आपल्याला जाहीर निमंत्रण देत असल्याचे सिन्हा यांनी सांगितले.
संस्था आपत्कालीन आणि अगदी कोविडच्या संकटात धावून आली आहे. संस्थेच्या माध्यमातून पुण्यात काश्मिरी तरुणांसाठी मोठे काम उभे केले आहे. त्यांच्या शिक्षणासाठी, महत्त्वपूर्ण काम केले आहे. त्यांच्या शिक्षणातील आरक्षणासाठी बाळासाहेबांनी पाठिंबा दिला होता. ज्या ज्यावेळी काश्मीरला आलो त्यावेळी येथील बांधवानी आपल्यावर भरभरून प्रेम केल्याचे सांगून, मुख्यमंत्र्यांनी आपण सदैव काश्मिरी बांधवांच्या प्रगतीसाठी सज्ज राहणार असल्याचा पुनरूच्चार केला.