संजय राणे
विरार।
नैसर्गिक नाल्यांवर झालेले अतिक्रमण, नियोजनाचा अभाव आणि आयुक्तांनी दिलेल्या आश्वासनांचा त्यांना स्वतःलाच पडलेला विसर यामुळे वसई-विरारमधील नाले जीवघेणे ठरत आहेत.
वसई-विरारमध्ये 208 नाले आहेत. मध्यंतरी पालिकेने आणखी दोन नवीन नाल्यांचा शोध घेतला होता. या नाल्यांची एकूण लांबी 198 किलोमीटर आहे. यात अनेक ठिकाणी नाल्यांवर भरणी करून पात्र अरुंद करण्यात आल्याचे समोर आले होते. नाल्यांवर झालेल्या अतिक्रमणामुळे शहराला पुराचा सामना करावा लागत असल्याने पालिकेने नवीन नाल्यांची शोधमोहीम हाती घेतल्याची माहिती आयुक्त अनिलकुमार पवार यांनी दिली होती. प्रत्यक्षात असलेल्या नाल्यांचे संवर्धन आणि संरक्षण करण्यात वसई-विरार महापालिका कमी पडत असल्याने हे नाले जीवघेणे ठरत आहेत.
जीवदानीच्या पायथ्यापासून सुरू झालेला व मनवेलपाडा गावातून रेल्वे कल्व्हर्टला मिळणार्या नाल्याच्या संरक्षण व संवर्धनाकडे पालिकेचे दुर्लक्ष झाल्याने हा नालाही जीवघेणा झाला आहे. या नाल्यावर अंदाजे दीड कोटी रुपये खर्च करून पालिकेने स्लॅब टाकले आहेत. मात्र नागरिकांपेक्षा या ठिकाणी अतिक्रमणे करणार्यांनाच पालिकेच्या या कथित विकासाचा फायदा झाला असल्याने पालिकेविरोधात संताप व्यक्त होत आहे. पालिकेच्या या कथित विकासाचे घोंगडे मागील दोन वर्षे भिजत पडले आहे. त्यांनतरही काम पुढे जात नसल्याने हा नाला जीवघेणा ठरत आहे.
पालिकेने स्लॅबचे काम थांबल्याने यातून निघालेल्या सळ्या बाहेर डोकावत आहेत. असलेल्या स्लॅबवर वाहने पार्क करण्यासाठी अतिक्रमण झाले आहे. शिवाय स्लॅबमुळे नाल्यांची सफाई होत नसल्याने नाला तुंबला आहे.
परिसरात अस्वच्छता आणि दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उर्वरित नाल्याला संरक्षक कठडा नसल्याने नाल्याला लागूनच छोटा रस्ता असल्याने वाहनचालक थेट या नाल्यात कोसळून अपघात होण्याची शक्यता आहे.
मागील वर्षी एक दुचाकीस्वार थेट या नाल्यात कोसळल्याची दुर्घटना घडली होती. मात्र या दुर्घटनेतून पालिकेने शहाणपण घेतलेले नाही.
आयुक्तांना आश्वासनांचा विसर
वसई विरार महापालिकेने यंदा 95 टक्के नालेसफाई करूनही शहरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. यामागचे कारण शोधले असता शहरातील नैसर्गिक नाले अतिक्रमणाखाली गेल्याची माहिती समोर आली. अनेक ठिकाणी नाले बुजवून त्यावर अतिक्रमण करण्यात आलेले आहे. यामुळे शहराला पुनःपुन्हा पुराचा फटका सहन करावा लागत आहे. यासाठी आता पालिका नैसर्गिक नाल्यांचा शोध घेणार होती. यासाठी पालिका प्रभाग समिती स्तरावर पथक निर्माण करणार असून, त्यात स्थानिक ज्येष्ठ नागरिक, पत्रकार आणि सामाजिक संघटनांचे सहकार्य घेणार होती. याकरिता शहराच्या भौगोलिक रचनेचा अभ्यास करून पुढील आखणी करण्यात येणार असल्याचे आयुक्त अनिलकुमार पवार यांनी सांगितले होते. ज्या नाल्यांवर अतिक्रमणे आहेत, अशा ठिकाणी तातडीने कारवाई केली जाईल. यासाठी पालिका लवकरच नागरिकांना वृत्तपत्रातून आवाहन करणार असल्याचेसुद्धा पालिका आयुक्तांनी म्हटले होते. असे असले तरी आयुक्तांना या सगळ्या आश्वासनांचा विसर पडला आहे.
25 वर्षीय तरुणाचा गटारात पडून मृत्यू
वसई विरार महापालिकेच्या भोंगळ कारभाराचा आणखी एक बळी गेला आहे. नालासोपारा येथे मंगळवारी रात्री उघड्या गटारात पडून 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. 7 नोव्हेंबर रोजी विरार पश्चिमेला एका वयोवृद्ध महिलेचा उघड्या गटारात पडून मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असताना नालासोपारा पूर्वेच्या अग्रवालनगर परिसरातील एका गटारात ऋषभ सरकार (25) याचा पडून मृत्यू झाला आहे. ऋषभ याच परिसरातील पार्वती अपार्टमेंटमध्ये राहत होता. ऋषभ कामानिमित्त दुपारी बाहेर गेला होता. त्याच्या इमारतीच्या शेजारी उघडे गटार आहे. रात्री घरी येताना पदपाथावरून चालत असताना अंधार असल्याने त्याला रस्त्याचा अंदाज आला नाही आणि त्याचा तोल जाऊन तो गटारात पडला. त्यात त्याचा बडून मृत्यू झाला. ऋषभ हा आपल्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता. तो जानेवारी महिन्यात परदेशात नोकरीसाठी जाणार होता. मात्र वडिलांना कर्करोग असल्याने त्यांच्या उपचारासाठी तो घरातून काम करीत होता. त्याच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पालिकेने पावसाळ्यात सर्व उघडी गटारे बंदिस्त केल्याचा दावा केला होता. मात्र सलग महिनाभरात दोन जणांना उघड्या गटारात आपला जीव गमवावा लागला असल्याने पालिकेचा दावा फोल ठरला आहे.