राम जगताप | तर्काचा घोडा
‘एकला चलो रे!’ हे आत्मनिर्भरतेचं घोषवाय मानलं जातं. रूढ, पारंपरिक वाटा जाणीवपूर्वक नाकारून वेगळ्या वाटा चोखाळणार्यांचं वर्णन करण्यासाठी हा वाप्रचार मराठीत अनेकदा वापरला जातो. ‘एकला चलो रे!’ वेगळं आणि ‘एकांडी शिलेदारी’ वेगळी. ‘वेडात मराठे वीर दौडले सात’छाप पद्धतीला ‘एकांडी शिलेदारी’ म्हणतात. आपल्याकडे तोच जास्त आवडता आणि म्हणून रुळलेला वाप्रचार आहे. ‘एकला चलो रे!’चं तसं आपल्याला अप्रूप खूप, पण त्याची उदाहरणे कमीच सापडतात. कारण त्यासाठी लागणारी विजिगीषू वृत्ती आपल्याकडे फारशी नाही. आत्मनाश-आत्मघात-आत्ममग्नता हेच ज्यांचं प्रधान वैशिष्ट्य असतं, त्यांच्याकडून ‘एकला चलो रे!’सारखं प्रतिभादर्शन कसं घडणार?
असो, मूळ मुद्द्यावर येण्यासाठी कधी कधी अशी जरतारी सुरुवात केल्यामुळे लेखाला वजन येतं असं म्हणतात! दर आठवड्याला विषय शोधून त्यावर किमान वाचनीय लिहिणं ही काही खायची गोष्ट नाही. कधी कधी घाम निघतो, कधी कधी विषय निवडण्यासाठी काबाडकष्ट करावे लागतात. आणि समजा मिळाला विषय तरी त्यावर मनाजोगतं लिहून होतंच असं नाही.
कारण लिहिणं ही सर्जन प्रक्रियाच कमालीची कष्टदायी असते. म्हणूनच नेमाडेंसारखे विचक्षण कादंबरीकार त्याला प्रसववेदनांचा सोहळा मानतात. पण मराठीतल्या बहुतेक साहित्यिकांना कागदच इतया हाका मारीत असतात की, त्यांना प्रसववेदनांचा सर्जन सोहळा अनुभवण्याची तितिक्षा धरवत नाही. ते टेस्ट ट्यूब बेबीचा पर्याय निवडून मोकळे होत राहतात.
कदाचित म्हणूनच नाट्यछटा म्हटलं की, दिवाकर हे एकच नाव आठवतं. विडंबन काव्य म्हटलं की केशवकुमार आठवतात. आणि वर्तमानपत्रातील दैनंदिन सदर म्हटलं की, तेंडुलकरांची ‘कोवळी उन्हे’! १९६६-६७ साली तेंडुलकरांचं हे सदर दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये सलग वर्षभर प्रसिद्ध झालं. त्यातील निवडक लेखांचा संग्रह त्याच नावानं २४ ऑगस्ट १९७१ रोजी प्रकाशित झाला. त्याला कालच्या २४ ऑगस्टला पन्नास वर्षं पूर्ण झाली.
मराठी वर्तमानपत्रांत अनेकांनी प्रदीर्घ काळ सदरलेखन केल्याची उदाहरणे सापडतात. वि. श्री. मोडक (कृष्णद्वैंपायन) यांनी ३८ वर्षं प्रभातमध्ये ‘प्रभातची किरणे’ हे राजकीय टीकाटिपण्णी सदर लिहिलं. प्रमोद नवलकर यांनी तर ५०हून अधिक वर्षं ‘भटयाची भ्रमंती’ हे सदर नवशक्तीमध्ये लिहिलं. अशोक जैन (कलंदर) यांनी मटामध्ये ‘कानोकानी’ हे सदर आठ-नऊ वर्षं लिहिलं. श्रीकांत बोजेवार (तंबी दुराई) यांनी लोकसत्तामध्ये ‘दोन फुल एक हाफ’ हे सदर ९-१० वर्षं लिहिलं. पुरुषोत्तम बोरकर यांनी ‘होबासया’ हे सदर १५-२० वर्षं लिहिलं. अशी अजून काही उदाहरणं सांगता येतील. ही सगळी सदरं साप्ताहिक होती. गेली काही वर्षं प्रवीण टोकेकर (ब्रिटिश नंदी) सकाळमध्ये ‘ढिंग टांग’ हे राजकीय टीकाटिपण्णीचं दैनंदिन सदर लिहीत आहेत.
थोडयात, सलग वर्षभर दैनंदिन सदरलेखन करण्याचा आणि ते अतिशय वाचकप्रिय करण्याचा तेंडुलकरांचा विक्रम आजवर अबाधितच राहिला आहे. गेल्या पन्नास वर्षांत ‘कोवळी उन्हे’सारखं सदर कुणालाही लिहिता आलं नाही. प्रयत्न तर अनेकांनी केले. ‘कोवळी उन्हे’नंतर मटातल्या काहींनी ते चालवण्याचा प्रयत्न करून पाहिला, पण जमलं नाही. त्यानंतरच्या काळात अनेकांनी स्वत:ला आजमावून पाहिलं. मात्र कुणालाही सलग वर्षभर खुमासदार, रंगतदार आणि तेंडुलकरांइतया बहारदार पद्धतीनं ते लिहिता आलेलं नाही. एवढंच कशाला खुद्द तेंडुलकरांही तसं सदर परत लिहिता आलं नाही. तशा मागण्या नंतरच्या काळात त्यांना इतर वर्तमानपत्रांनीही केल्या. मटानेसुद्धा केली, पण त्याला त्यांनी नम्रपणे नकार दिला. दै. लोकसत्तामध्ये नोकरी करत असतानाच्या काळात त्यांना ‘कोवळी उन्हे’सारखं सदर लिहिण्यास सांगितलं गेलं. पण तेही फार दिवस चाललं नाही. अरुण टिकेकर दै. लोकसत्ताचे संपादक असताना त्यांनी परत आग्रह करून तेंडुलकरांना ‘रामप्रहर’ हे दैनंदिन सदर लिहायला लावलं खरं, पण ते जेमतेम सहा महिनेच चाललं. शिवाय त्यातही ‘कोवळी उन्हे’ची गंमत नव्हती. ‘कोवळी उन्हे’चे निर्मम, निर्मळ आणि नि:पक्ष तेंडुलकर तोवर उरलेले नव्हते. केवळ माणसं, घटना यांच्याकडे पाहण्याची त्यांची दृष्टी एका संवेदनशील, सजग, विचारी आणि चिंतनशील तेंडुलकरांनी घेतली होती.
१९७१ साली या सदरातील ७९ लेखांचं ‘कोवळी उन्हे’ या नावानं पुस्तक प्रकाशित झालं. त्याचंही स्वागत झालं. अनेक ठिकाणी त्याची परीक्षणं प्रकाशित झाली. आजवर या पुस्तकाच्या सात-आठ आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. मराठी ग्रंथव्यवहाराचा एकंदर लसाविमसावि पाहता हा खप चांगला झाला, असंच म्हणायला हवं. पहिल्या आवृत्तीला तेंडुलकरांनी जेमतेम पाऊण पानाचं प्रास्ताविक लिहिलं होतं. पण चौथ्या आवृत्तीला मात्र ‘उन्हातले दिवस’ या नावाने सविस्तर प्रस्तावना लिहून त्यांनी या सदरामागची कहाणी सांगितली. त्यात शेवटी ते म्हणतात – या सदराने माझा मूळ स्वभावच बदलून टाकला. तोवरचा अबोल, अंतर्मुख, गंभीर आणि कुढ्या मी बाहेर बघणारा, बोलका, माणसांचा लोभी, जगण्यावर निहायत प्रेम करणारा झालो.
या प्रस्तावनेआधी तेंडुलकरांनी पत्रकार या १९८४ सालच्या दिवाळी अंकात ‘सुखद कोवळी उन्हे’ या नावानं एक लेख लिहिला आहे. हा लेख एक प्रकारे तेंडुलकरांच्या वरील विधानाचं संदर्भासह स्पष्टीकरणच आहे.
या सदरातील बहुतेक लेख मुंबईविषयीचे, तिथल्या माणसांचे, त्यांच्या जगण्याविषयीचे आहेत. रोज सकाळी तेंडुलकर नोकरीवर निघाल्यासारखे घराबाहेर पडून शहरभर वाट्टेल तसे फिरायचे. डोयात सतत सदराचाच विचार. त्यात सदराचं स्वरूप हलकंफुलकं, माणसाच्या दैनंदिन जगण्यातल्या घडामोडींविषयी. त्यामुळे त्याचं स्वरूप लालित्यपूर्ण. तेंडुलकर लिहितात – या सदराची इतकी सवय झाली की, काही वाचत असलो, सिनेमा पाहात असलो तरी डोयात यातून सदरासाठी काही मिळतंय का याचा आपोआपच शोध सुरू व्हायचा. त्यासाठी फार कष्ट पडेनासे झाले. काही काळानंतर ते माझ्या जगण्याचाच एक भाग झाला. त्यातले कष्ट कमी झाले. उतारावरून सायकल चालवताना जसं वाटतं तसं वाटू लागलं. लोकप्रियता खूप मिळाली. पत्रं खूप यायची. रोज महाराष्ट्र टाईम्स उघडल्यावर प्रथम ‘कोवळी उन्हं’च वाचतो. बाकीचा पेपर नंतर वाचतो, असं लोक सांगू लागले.
आपण जे लिहितो ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि त्यांना ते आवडलंही पाहिजे, असाच विचार करून तेंडुलकर लिहीत होते. त्यासाठी त्यांनी भाषा, शैली, मांडणी, विषय या सार्यांचीच काळजीपूर्वक निवड केली होती.
खरंतर तोवर तेंडुलकरांचं कथाकार-नाटककार म्हणून नाव होत होतं. श्रीमंत, ङ्गमाणूस नावाचे बेट, मधल्या भिंती, मी जिंकलो! मी हरलो!, सरी ग सरी, कावळ्यांची शाळा, एक हट्टी मुलगी ही नाटकं; रात्र आणि इतर एकांकिका, अकेकाचा आजार, अंधेरनगरीतला कंटाळा-दिन, चित्रगुप्त, अहो चित्रगुप्त!, अजगर आणि गंधर्व हे एकांकिकासंग्रह; गाणे, काचपात्रे, द्वंद्व, मेषपात्रे हे कथासंग्रह आणि इथे बाळे मिळतात, चिमणीचं घर होतं मेणाचं, पाटलाच्या पोरीचं लगीन, चिमणा बांधतो बंगला ही बालनाट्यं अशी त्यांची पुस्तकं प्रकाशित झाली होती. पण या सर्व लेखनापेक्षा ‘कोवळी उन्हे’चे तेंडुलकर वेगळेच होते. त्यामुळे या सदराचं जसं मान्यवरांनी कौतुक केलं, तशी त्यावर सौम्य प्रकारची टीकाही केली. श्री. पु. भागवतांना ते भावविवशतेकडे व नाट्यमयतेकडे जरा अधिक झुकणारे वाटलं. समीक्षक सरोजिनी वैद्य यांना तर कोवळी उन्हे हे शीर्षक खांडेकरी वाटलं. तर ज्येष्ठ साहित्यिक मुकुंद टाकसाळे म्हणतात – या सदरातले दोन-चार लेख तर तेंडुलकरांनी लिहिलेत की, पु.लं.नी असा प्रश्न पडतो.
हे पुस्तक आजही वाचताना कंटाळा येत नाही. (अर्थात आता त्यातले सर्वच लेख आवडतात असं नाही.) त्याचं कारण तेंडुलकरांची लेखनशैली हे आहे. दैनंदिन स्तंभलेखन असलं तरी या सदराचा कुठलाही एक फॉर्म नव्हता. त्याची भाषा व शैलीही विषयानुसार बदलणारी आहे. या लेखनाला ललित म्हणावं तर त्यात कथाबीजं आहेत, चित्र-रसग्रहण आहे, प्रवासवर्णन आहे, मासलेवाईक-तर्हेवाईक व्यक्तिचित्रं आहेत. काही लेखांत उपहास आहे, काहींत मिश्किलपणा आहे. व्यथा आहे, लाथाही आहेत. असहायता आहे, शोकांतिका आहे. नाट्य आहे, मार्गदर्शन आहे, चिंतन आहे आणि निवेदनही आहे. चरित्रकार यासारखे तेंडुलकर कधी तटस्थपणे पाहतात, कधी कादंबरीकार यासारखे विषयात गुरफटून जातात, कधी कवीसारखे स्वत:लाच विसरून जातात, कधी कथाकारासारखे कथनही करतात. कधी ललित लेखक यासारखे बारीकसारीक तपशील टिपतात. वैयाकरणीसारखी भाषा मोजूनमोपून वापरतात, शब्दांचं वजन पारखून घेतात. थोडयात अनेक साहित्यप्रकारांचा समावेश त्यांनी या सदरलेखनात केला आहे.
‘कोवळी उन्हे’ खरंतर मुंबईकेंद्रित होतं, पण ते मटाच्या अगदी खेड्यापाड्यातल्या वाचकांनाही आवडे. कारण तेव्हा मटा हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक मानदंड होता, मुंबई हे महाराष्ट्रातल्या राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक घडामोडींचं केंद्र झालेलं होतं. एकोणिसाव्या शतकातल्या पुण्याचं स्थान संयुक्त महाराष्ट्रानंतर मुंबईच्या वाट्याला आलं होतं. बहुभाषिक आणि बहुधर्मीय, शिवाय देशाची आर्थिक राजधानी असल्याने हे महाराष्ट्रातलं सर्वाधिक पुढारलेलं, आधुनिक शहर होतं. सत्यकथा, नवकथा, नवकविता, साठोत्तरी साहित्य या सगळ्याचा केंद्रबिंदू मुंबईच होता. शिवाय ती मायानगरी होती. अशा मुंबईचं अतिशय लालित्यपूर्ण दर्शन तेंडुलकर रोजच्या रोज उर्वरित महाराष्ट्राला घडवत होते. तसं पाहिलं तर हे सदर तेंडुलकरांच्या गळ्यात पडलं होतं. ते लिहिण्याची त्यांची तयारी नव्हती. पण मटाचे तत्कालीन संपादक द्वा. भ. कर्णिक हे त्यांचे जुने मित्र. त्यांच्या आदेशवजा आग्रहामुळे त्यांनी भीत भीत लिहायला सुरुवात केली आणि हळूहळू ते त्यात रमत गेले. अर्थात रोजच्या रोज लिहिणं हे दुष्कर काम होतं. पण एकदा जबाबदारी स्वीकारल्यानंतर तेंडुलकरांनी त्यासाठी सर्व प्रकारची मेहनत घेतली. तेंडुलकर यांसारख्या प्रथितयश लेखकाने एखाद्या सदरात इतके गुंतून पडायला हवं होतं का, असा कुणाला प्रश्न पडू शकतो. त्याचं उत्तर असं आहे की, ते तितके गुंतून पडल्यामुळे हे सदर इतकं लोकप्रिय झालं. ध्यानीमनी नसताना आणि खरंतर पुरेशी तयारी नसताना तेंडुलकरांनी लिहायला सुरुवात केली आणि वृत्तपत्रीय सदरलेखनाचा एक वस्तुपाठ तयार झाला.
या सदरानं तेंडुलकरांना वैयक्तिक पातळीवरही खूप काही दिलं. ते म्हणतात – ‘कोवळी उन्हे’मुळे लेखक म्हणून माझा खूप फायदा झाला. मुद्देसूद लिहिणं, थोडया जागेत काहीएक आशय भरणे, ते सदर अतिशय वाचनीय करणं, त्याचा स्वत:चा असा एक फॉर्म तयार करणं, अशा सर्व सवयी मला ते सदर लिहिल्यामुळे लागल्या. लेखक म्हणून त्या एका वर्षात मी खूप मिळवलं. माझ्यात खूप आत्मविश्वास निर्माण झाला. एका अर्थी ते आव्हानच होतं. पुढे ज्यांनी ते लिहिण्याचा प्रयत्न केला, त्यांना ते जमलं नाही. वर्षभर मी ते पेललं. सुरुवातीला मला ते अशय वाटत होतं. पंधरा दिवसांतच मी थकणार असं वाटलं होतं. पण पुढं अशी वेळ आली की, मी थांबलो नसतो तर ते थांबले. आपण अतिशय व्यापक वाचकांपर्यंत पोहोचू शकतो. त्यांनाही आपलं लिखाण आवडू शकतं, असा विश्वास माझ्यात निर्माण झाला. एक प्रकारची भाषा घडवणं, मुळात जो नाही असा त्या सदराचा साचा तयार करणं, हे मला जमलं. सदराच्या निमित्ताने बघण्याची एक नजर मिळाली. या सगळ्याचा पुढे उपयोग होत गेला.
तेंडुलकरांची गाजलेली, वादग्रस्त ठरलेली नाटकं, सिनेमे आणि इतर महत्त्वाचं लेखन हे सगळं ‘कोवळी उन्हे’नंतरचं. म्हणजे आज आपल्याला, देशाला आणि जगाला माहीत असलेले तेंडुलकरही त्यानंतरचे आहेत. त्या वर्षात तेंडुलकरांनी या सदराशिवाय इतर काहीच लिहिलं नाही. एखाद्या सदरासाठी इतकी मोठी गुंतवणूक तेंडुलकरांनाही नंतरच्या काळात करता आली नाही आणि इतरही कुणाला. म्हणून ‘कोवळी उन्ह’चा सुवर्णमहोत्सव साजरा करायला हवा.
[email protected]
मर्मग्राही विवेचन..