काही मराठा मुलांनी अंबाबाईची देव्हार्यात जाऊन पूजा केली होती. त्याबद्दल त्या मुलांना शाहूंनी शिक्षा केली होती. त्यामुळे प्रबोधकरांच्या लेखणीचा प्रसाद चाखवा लागला. क्षत्रिय शंकराचार्य बनवण्याविषयीही प्रबोधनकारांनी छत्रपती शाहूंवर टीका केली होती. असं असलं तरी छत्रपती शाहूंनी प्रबोधनकारांवरचा लोभ तसाच ठेवला. एका रात्री दादर भागात एक गाडी कोदंडाला शोधत फिरत होती. शाहू महाराज प्रबोधनकारांना कोदंड म्हणून हाक मारत. महाराजांची माणसं प्रबोधनकारांकडे आली आणि शाहू महाराजांकडे घेऊन गेली. खूप रात्र झाली होती. महाराज आजारी होते. छत्रपती प्रतापसिंह आणि रंगो बापूजी यांचा इतिहास लिहेनच, अशी शपथ छत्रपतींनी आपल्या हातावर हात ठेवून घ्यायला लावली. सकाळी महाराजांच्या मृत्यूची बातमी आली.
प्रबोधनची पत्रकारिता
लहानपणी पनवेलला असतानाच प्रबोधनकारांना पॉकेट एनसाक्लोपेडिया नावाचं एक छोटं पुस्तक सापडलं. त्यातल काही माहितीपर भाग भाषांतर करून त्याकाळी लोकप्रिय असलेल्या ह. ना. आपटेंच्या ‘करमणूक’मध्ये पाठवला. तो छापण्यात आला. हरिभाऊंनी पत्र पाठवून आणखी लेख मागवले आणि प्रबोधनकारांच्या लिखाणाला सुरुवात झाली. केरळकोकीळकार कृष्णाजी नारायण आठल्ये यांनी पनवेल मुक्कामी लेखन आणि पत्रकारितेचे संस्कार प्रबोधनकारांवर केले. त्याआधी शाळेत असतानाच ‘विद्यार्थी’ नावाचं एक साप्ताहिक सुरू केलं होतं. त्यासाठी एक घरगुती छपाई यंत्रही बनवलं. एका आठवड्याला पन्नास अंक छापले. चार पाच महिने चालवलं. पण प्रत्यक्षात त्यांच्या हाताला शाई लागली ती मुंबईच्या ‘तत्त्वविवेचक’ छापखान्यात. 1908 च्या सुमारास ते तिथं असिस्टंट प्रूफरिडर होते. तिथे असतानाच ते विविध ठिकाणी टोपण नावांनी लिहीत. तर नावाने ‘इंदुप्रकाश’ आणि ठाण्याचं ‘जगत्समाचार’ या वृत्तपत्रांत लिहीत होते. त्यानंतर त्यांनी जळगाव इथे ‘सारथी’ हे मासिक वर्षभर चालवलं. पण त्यांच्या लेखणीला खरा बहर आला तो ‘प्रबोधन’मुळे. 16 ऑक्टोबर 1921 रोजी हे पाक्षिक सुरू झालं. ब्राह्मण ब्राह्मणेतर वादात नव्या वादांना जन्म देण्यासाठी आणि आक्षेपांना उत्तर देण्यासाठी त्यांना स्वतःच्या मालकीचं नियतकालिक हवं होतं. fortnightly Journal devoted to the Social, Religious and Moral Regeneration of the Hindu Society, असं ध्येय असणार्या प्रबोधनला राजकारणाचं वावडं मुळीच नव्हतं. त्या काळात सरकारी नोकराला स्वतःचं मासिक काढता येत नसे. पण आपल्या कामात अतिशय वाकबगार असलेल्या प्रबोधनकारांना ब्रिटिश सरकारने प्रबोधन काढण्याची विशेष सवलत दिली. पण आपल्या मतस्वातंत्र्याचा संकोच होतोय, असं वाटल्यावर त्यांनी लवकरच सरकारी नोकरीचा राजीनामा दिला. सामाजिक सुधारणांना पांढरपेशा समाजाच्या पुढे नेत बहुजनसमाजापर्यंत पोहोचवणारं प्रबोधन आगरकरांच्या ‘सुधारक’च्याही काही पावलं पुढे गेलेलं होतं, असं मराठी वृत्तपत्रांचा इतिहास लिहिताना रा. के. लेले सांगतात. प्रबोधनकारांच्या शैलीविषयी ते म्हणतात, ‘त्यांच्या वाणीच्या आणि लेखणीच्या शैलीला महाराष्ट्रात जोड सापडणे कठीणच! त्यांचा नुसता टोला नव्हे, तर सणसणीत प्रहार असे. वाचणार्याच्या अंगाचा तिळपापड व्हावा अशी त्यांची भाषा असे. पण ती अधिक बाळबोध, सोपी आणि अस्सल मराठमोळा वळणाची होती.’ महाराष्ट्रावर ‘प्रबोधन’चा खप आणि प्रभाव प्रचंड होता. त्याने आपल्या अवघ्या पाच सहा वर्षांच्या कालावधीत बहुजनवादी पत्रकारितेला मान्यता, वलय आणि विचारांचं प्रौढत्व मिळवून दिला. त्यामुळे ‘प्रबोधन’ बंद पडल्यानंतरही प्रबोधनकार हे बिरुद त्यांच्यामागे नावासारखं सन्मानानं येऊन चिकटलं. हाच वसा पुढे नेण्यासाठी त्यांनी पुण्यात असताना ‘लोकहितवादी’ नावाचं साप्ताहिकही वर्षभर चालवलं. ‘प्रबोधन’ बंद पडल्यानंतर त्यांनी स्वतःचं पत्र काढलं नाही. पण ते सतत लिहीत राहिले. मालती तेंडुलकरांच्या ‘प्रतोद’चे ते वर्षभर संपादक होते. ‘कामगार समाचार’पासून ‘कंदिल’पर्यंत आणि ‘विजयी मराठा’ पासून ‘किर्लोस्कर’पर्यंत अनेक नियतकालिकांत ते लिहित राहिले. ‘नवा मनू’मधील ‘तात्या पंतोजीच्या घड्या’, ‘सेवक’मधील ‘शनिवारचे फुटाणे’, ‘नवाकाळ’मधील ‘घाव घाली निशाणी’, ‘लोकमान्य’मधील ‘जुन्या आठवणी’ आणि ‘बातमीदार’मधील ‘वाचकांचे पार्लमेंट’ अशी त्यांची अनेक सदरं गाजली. शेवटच्या काळात ते प्रामुख्याने ‘मार्मिक’मधून लिहीत होते.
कर्मवीरांचे गुरू
ब्राह्मणेतर आंदोलनासाठी सातारा पिंजून काढताना भाऊराव पाटलांशी गाठ पडली. भाऊरावही प्रबोधनकारांप्रमाणेच सेल्समन. ते टायकोट घालून किर्लोस्करांचे नांगर विकायचे. पण बहुजनांना शिक्षण देण्यासाठी रयत शिक्षण संस्थेसाठी त्यांनी वाहून घेतलं. त्यांचा कामाचा सर्व आराखडा प्रबोधनकारांसमवेत दादरच्या खांडके बिल्डिंगमध्येच तयार झाला.
क्रमश:
– सचिन परब