दिनमान प्रतिनिधी
ठाणे।
बालकांचे प्राणघातक आजारांपासून संरक्षण व्हावे यासाठी राज्य शासनाकडून पाच वर्षांपर्यंतच्या बालकांचे लसीकरण करण्यात येते. त्यातही न्युमोनिया या आजारापासून संरक्षण करण्यासाठी 9 महिन्यांपर्यंतच्या बालकांना न्युमोकोकल कॉन्ज्युगेट लस (पीसीवी) देण्यात येते. परंतु गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून ठाणे जिल्ह्याच्या शहरी तसेच ग्रामीण भागात ही लसच उपलब्ध होत नसून यामुळे हजारो बालके या लशीपासून वंचित असल्याची माहिती पुढे आली आहे.
राज्य शासनालाच या लशींचा पुरेसा पुरवठा होत नसल्यामुळेच राज्यासह ठाणे जिल्ह्यात या लशींचा तुटवडा जाणवत असल्याची माहिती काही वैद्यकीय अधिकार्यांनी दिली.
राज्य सरकारमार्फत नुकतीच पोलिओ मोहीम राबविण्यात आली. ठाणे जिल्ह्याच्या शहरी भागात महापालिका तर, ग्रामीण भागात जिल्हा परिषदेकडून ही मोहीम राबविण्यात आली. त्यात अनेक बालकांना पोलिओचे डोस पाजण्यात आले. त्याचप्रमाणे बालकांचे विविध आजारांपासून संरक्षण व्हावे, यासाठी राज्य सरकारकडून पाच वर्षांपर्यंतच्या बालकांना विविध लस मोफत देण्यात येतात. त्यात क्षय, पोलिओ, हिपेटायटिस बी, घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, हिब-मेनिंनजायटिस आणि न्यूमोनिया, गोवर आणि रुबेला, जॅपनीज एनसेफेलायटीस (जे.ई) आणि रोटाव्हायरस (अतिसार) अशा लशींचा समावेश असतो. याशिवाय, बालकांमधील न्युमोनियाचा धोका कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून 9 महिन्यांपर्यंतच्या बालकांना न्युमोकोकल कॉन्ज्युगेट लस (पीसीवी) देण्यात येते. या सर्व लशी महापालिका तसेच जिल्हा परिषद आरोग्य केंद्रांच्या माध्यामतून बालकांना दिल्या जातात.
परंतु गेल्या दिड ते दोन महिन्यांपासून ठाणे जिल्ह्यात न्युमोकोकल कॉन्ज्युगेट लस उपलब्ध होत नसून यामुळे या लशीपासून बालके वंचित असल्याची माहिती पुढे आली आहे. न्युमोकोकल कॉन्ज्युगेट लस उपलब्ध होत नसून ही लस उपलब्ध व्हावी यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. परंतु राज्य सरकारला या लशींचा पुरेसा पुरवठा होत नसल्याने राज्यासह ठाणे जिल्ह्यात या लशींचा तुटवडा जाणवत आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात महिन्याला दोन ते तीन हजार बालकांना न्युमोकोकल कॉन्ज्युगेट लस देण्यात येते. कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रात महिन्याला एक ते दीड हजार बालकांना ही लस देण्यात येते. भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूरमध्येही महिन्याला हजारो बालकांना ही लस देण्यात येते. ठाणे जिल्ह्याच्या पाच तालुक्यांतील ग्रामीण भागात महिन्याला 11 हजार बालकांना ही लस देण्यात येते. गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून ही लस उपलब्ध होत नसल्यामुळे बालकांमध्ये न्युमोनियाचा धोका वाढण्याची भिती व्यक्त होत आहे.