दिनमान प्रतिनिधी
ठाणे|
सालाबादप्रमाणे यंदाही गणपतीसाठी कोकणात जाण्यासाठी रेल्वे गाड्यांचे आरक्षण सुरू झाले व काही मिनिटांतच फुल्ल झाले आहे. यामुळे कोकणातील प्रवाशांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. यावर आता लोकप्रतिनिधीही आवाज उठवू लागले आहेत. परंतु इतक्या वर्षांपासून खुलेआम सुरू असलेला रेल्वे तिकिटांचा काळाबाजार रोखण्यासाठी आश्वासक पावले उचलली जात नाहीत. यावर फक्त चर्चाच सुरू आहेत. रेल्वे तिकिटांचा आरक्षणाचा काळाबाजार हा रेल्वेचे अधिकारी व दलाल यांच्या संगनमताने होत असल्याचा आरोप वर्षानुवर्षे होत आहे. यावर तोडगा कधी निघेल, याची कोकणवासीयांना प्रतीक्षा आहे.
राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव तसेच राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना पत्रव्यवहार केला आहे. रेल्वे तिकिटांचे आरक्षण करून चढ्या दराने त्याची विक्री करण्याचे एक मोठे रॅकेटच सक्रीय आहे. यामध्ये कोणते रेल्वे अधिकारी व दलाल यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत. याची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे. तसेच हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
येत्या सोमवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे हे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी यांची दिल्लीत भेट घेऊन घेणार असून या विषयावर महत्त्वाची बैठक बोलावली आहे. तिकिटांचा काळाबाजार करणार्या लोकांना एकदा चाबकाने सरळ करायची गरज आहे. कोकणी माणसाला पुन्हा गणेशोत्सवात गावी जाताना हा त्रास होणार नाही हे पाहावे लागणार आहे. दोषी अधिकारी व एजंटची आता गय केली जाणार नाही, असा इशाराही नितेश राणे यांनी दिला आहे.
कोकणातील खासदार बिनकामाचे
या प्रश्नी आता सर्व रेल्वे संघटनांनी एकत्र येण्याचे आवाहन उपनगरीय रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी केले आहे. हे आरक्षणाचे दुखणे दर वर्षीचे असून कोकणातले खासदारही या प्रश्नावर आवाज उठवत नाहीत. ते फक्त बघ्याची भूमिका दर वर्षी घेत असतात. त्यासाठी आता सर्व रेल्वे संघटनांनी या प्रश्नावर एकत्र येऊन उठाव करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले आहेत. तर दुसरीकडे या आरक्षणाच्या मुद्यावर नाव न छापण्याच्या अटीवर रेल्वे अधिकार्यांनी सांगितले आहे की, याबाबत नेहमी तक्रारी येत असतात; पण गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्या नोकदारांची संख्या ही कित्येक लाखाच्या घरात असते. पण तिकिटांची संख्या मर्यादित असल्याने आरक्षण लगेच फुल्ल होत आहे. यासाठी रेल्वे प्रशासनाकडून अधिकच्या रेल्वे गाड्या सोडण्यासाठी प्रयत्न होत आहेत, असे रेल्वे अधिकारी सांगत आहेत.
गणेशोत्सवात जादा गाड्या सोडल्या तरी त्या गाड्यांचे आरक्षणसुद्धा याच प्रमाणे काही मिनिटांत फुल्ल होणारे असेल तर त्याचा उपयोग काय? असा प्रश्न केनत बंगाल या कोकणवासीय प्रवाशाने विचारला आहे. कोकणात जाणार्या गाड्यांचे आरक्षण फुल करून दलाल तिप्पट भावाने कोकणवासीयांकडून तिकिटांचे दर आकारत असतात. तीनशे ते चारशे रुपयांचे स्लीपर कोचचे तिकीट हजार ते दीड हजार रुपयांना विकले जाते. तर थ्री टीयर, टू टीयर श्रेणीचे ११०० ते १३०० रुपयांचे तिकीट हे तीन ते चार हजार रुपयांना विकले जाते.
गाड्या व त्यांचे तिकीट दर
- गाडी क्रमांक २०१११ कोकण कन्या एक्सप्रेस : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते रत्नागिरी यामध्ये तिकीट दर स्लीपर कोच २९५ रुपये, थ्री टीयर एसी ७६५ रुपये, टू टीयर एसी १०६५ रुपये असे तिकिटांचे दर आहेत.
- गाडी नंबर १२६१९ मत्स्यगंधा एक्सप्रेस : लोकमान्य टिळक ते रत्नागिरीसाठी तिकिटांचे दर स्लीपर २८५ रुपये, थ्री टीयर एसी ७४० रुपये, टू टीयर एसी १०३० रुपये आहेत.
- गाडी नंबर १०१०३ मांडवी एक्सप्रेस : छत्रपती शिवाजी टर्मिनल ते रत्नागिरी, तिकिटांचे दर स्लीपर २६५ रुपये, थ्री टीयर एसी ७२० रुपये, टू टीयर एसी १०२० रुपये आहेत.