दिनमान प्रतिनिधी
ठाणे।
भारतीय रेल्वेचे जनक व आधुनिक मुंबईचे शिल्पकार नाना शंकरशेट यांचे नाव मुंबई सेंट्रल टर्मिनसला देण्यात यावे. या मागणीसाठी ठाणे जिल्हा पत्रकार संघाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला आहे. त्यानुसार, प्राप्त निवेदनावर तातडीने शेरा मारून पंतप्रधानांच्या अनुमतीसाठी मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शवल्याची माहिती पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे यांनी दिली.
मुंबई सेंट्रल टर्मिनसचे नाना शंकरशेट मुंबई टर्मिनस नामकरण करण्यासाठी दैवज्ञ समाज तसेच नाना शंकरशेट प्रतिष्ठान गेली अनेक वर्षे प्रयत्न करत आहे. राज्य सरकारने 20 मार्च 2020 रोजी नामांतराचा प्रस्ताव मंजूर करून केंद्र सरकारकडे पाठविला आहे. त्यानंतर राज्यातील अनेक खासदारांनी केंद्र सरकारला निवेदने दिली. समाजाच्या पदाधिकार्यांनी संबंधित मंत्री, रेल्वे अधिकारी यांची भेट घेतली होती. त्या अनुषंगाने तत्कालीन रेल्वे उपसंचालकांना नामकरण करण्यासंदर्भात नियमानुसार कार्यवाहीचे निर्देशही रेल्वे राज्यमंत्री यांच्या कार्यालयाने दिले होते. मात्र, आजतागायत या नामांतराचे घोंगडे भिजत पडले आहे.
जगन्नाथ उर्फ नानाशंकरशेट हे मुळचे ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथील असून ते ठाणे जिल्ह्याचे सुपुत्र आहेत तसेच त्यांचे काही काळ वास्तव्य व येणे जाणे घोडबंदर रोड गावामध्ये होते, तिथे त्यांचा जुना वाडा आणि त्यांनी स्थापन केलेले शंकराचे मंदिरही आहे.
या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्याच्या या सुपुत्राचे नाव मुंबई सेंट्रल टर्मिनसला द्यावे. तसेच, राज्य सरकार व केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नुकतीच भेट घेऊन निवेदन सादर केले. यावर मुख्यमंत्र्यांनी तातडीने प्रस्ताव सादर करण्यात यावा. असा शेरा मारला आहे.
मुंबई ते ठाणे पहिली रेल्वे 16 एप्रिल 1853 साली धावली. या रेल्वेचे जनक म्हणून ओळखले जाणारे नाना शंकरशेट यांचे नाव मुंबई सेंट्रल टर्मिनस ला देण्यात यावे. या मागणीसाठी ठाण्याचे आमदार संजय केळकर तसेच शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी मांडून या विषयाकडे सरकारचे लक्ष वेधण्याचे ठरवले आहे.