दिनमान प्रतिनिधी
उल्हासनगर। यापूर्वीच्या सात अभय योजनेतील सर्व वसुलीचे विक्रम इतिहासजमा करणार्या उल्हासनगर पालिकेच्या मालमत्ता कर विभागाने 107 कोटींची रेकॉर्डब्रेक वसूली केली आहे. रात्री 12 पर्यंत अभय योजना सुरू राहणार असल्याने या आकडेवारीत वाढ होण्याची शक्यता आहे.
15 मार्चपर्यंत उपायुक्त प्रियंका राजपूत यांची टीम ऑन द फिल्ड उतरल्याने आणि 64 हजार करबुडव्यांना वॉरंट बजावल्याने 57 कोटी वसुलीची दमदार सुरुवात केली होती. त्यात भर पडावी म्हणून शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, विरोधी पक्षनेते राजेश वानखेडे यांनी अभययोजना लागू करण्याचा अशासकीय प्रस्ताव महासभेत मांडल्यावर तो संमत झाला होता. मात्र आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांनी तो विखंडित करण्यासाठी सरकारकडे पाठविला होता. तेव्हा नगरसेवक अरुण आशान यांनी व्यापार्यांसोबत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन अभय योजनेबाबत साकडे घातले होते. डॉ. शिंदे यांनी केलेल्या मागणीनुसार नगरविकास व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने उल्हासनगरात 16 ते 31 मार्चपर्यंत अभययोजना सुरू झाली होती.
या योजनेसाठी मालमत्ता कर विभाग व नागरी सुविधा केंद्र प्रथम रात्री आठपर्यंत व त्यानंतर 29 ते 31 मार्चच्या रात्री 12 पर्यंत ऑन-ड्युटी सुरू ठेवण्यात आला होता. अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त प्रियंका राजपूत यांच्या नेतृत्वाखाली कर निर्धारक व संकलक जेठाचंद करमचंदानी, उपकर निर्धारक व संकलक उद्धव लुल्ला, मनोज गोकलानी, कर निरीक्षक गणेश शिंदे, राम आयलानी, उषा मौळे, किशोर आईलसिंघानी, सुखदेव भंबानी या टीमसोबत नागरी सुविधा केंद्रातील कर्मचारी ही टीम सुट्टीच्या दिवशीही ऑन-ड्युटी राहिली.
उल्हासनगरात 7 वेळेस अभययोजना राबवण्यात आली. यंदा 107 कोटींच्या आसपास वसूली झाली आहे. त्यामुळे यापूर्वीचे 2014 मधील 103 कोटी 28 लाख,2015 मधील 61 कोटी 47 लाख,2016 मधील 87 कोटी 82 लाख, 2017 मधील 93 कोटी 54 लाख,2018 मधील 80 कोटी 28 लाख, 2019 मधील 76 कोटी 95 लाख, 2020 मधील 70 कोटी 90 लाख हे वसुलीचे रेकॉर्ड मोडीत निघाले आहेत.
कर भरण्यासाठी उसळलेली गर्दी पाहून महापौर लिलाबाई आशान यांनी उपायुक्त प्रियंका राजपूत यांच्या नागरी सुविधा केंद्र व मालमत्ता कर विभागाला भेटी देऊन करदात्यांचे आभार मानले. जेवढी आकडेवारी जमा होणार तशा आकडेवारीचा केक उद्या शुक्रवारी कापून गुढीपाडव्याचा जल्लोष साजरा करण्यात येणार आहे.