दिनमान प्रतिनिधी
मुंबई।
रेल्वेरूळ ओलांडण्यासह प्रवाशांनी खच्चून भरलेल्या लोकलमधून पडल्याने प्रवाशांचा बळी जाण्याच्या घटना मध्य रेल्वेमार्गावर नव्या नाहीत.
फक्त सप्टेंबर 2023 मध्ये अशा 288 घटना घडल्या. तर रेल्वेरूळ ओलांडण्याच्या 505 घटना घडल्या आहेत. हे सर्व रोखण्यासाठी मध्य रेल्वेने शून्य मृत्यू मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत मुंबईतील सर्व खासगी, सरकारी, निमसरकारी अशा कार्यालये, संस्थांना वेळा बदलण्याची विनंती मध्य रेल्वेने केलेली आहे. सुमारे 450 कार्यालयांना विनंती पत्र धाडले आहे. परिणामी लोकलमधील गर्दी कमी होण्यास मदत झाली आहे.
छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे म्हणजेच अप दिशेने सकाळी येताना 8 वाजल्यापासून 11 पर्यंत कार्यालयात येण्याच्या वेळा कराव्यात. जर छत्रपती शिवाजी टर्मिनसपासून कल्याण दिशेने म्हणजेच डाऊन दिशेकडे जाताना कार्यालयाच्या वेळा सायंकाळी 5 ते रात्री 8 दरम्यान ठेवाव्यात. यामध्ये सरकारी, खासगी संस्थांनी सकाळी 9:30 ते 11:30 पर्यंत कार्यालयात येण्याची मुभा ठेवावी. तर सायंकाळी ऑफिसमधून घरी निघण्यासाठी 5:45 पासून 07:45 पर्यंत कार्यालयातून बाहेर पडण्याची मुभा ठेवावी. जेणेकरून लोकलची गर्दी कमी होऊन अपघात आणि मृत्यू कमी होण्यास मदत होणार आहे.
रेल्वेने गर्दी टाळण्यासाठी पुढाकार घेत मुंबईतील मंत्रालयीन कर्मचार्यांसह इतर सर्व विभागांना तसेच केंद्र सरकारच्या मुंबई, ठाण्यातील विविध प्राधिकरण, राज्य सरकार विविध प्राधिकरण, मुंबई महापालिका, ठाणे महापालिकेसहित खासगी औद्योगिक, व्यापारी, कॉर्पोरेट संस्था, कार्यालये अशा 450 संस्थांना विनंती पत्र धाडले आहे.
मध्य रेल्वेचे मुंबई विभागाचे प्रबंधक रजनीश कुमार गोयल म्हणाले की, लोकलमध्ये प्रचंड गर्दीमुळे अपघातात नागरिकांचा जीव जातो. ते टाळण्यासाठी आम्ही झीरो डेथ मोहीम सुरू केली आहे. यामध्ये सरकारी, खासगी, निमसरकारी संस्था, कार्यालयांनी आपल्या कार्यालयांच्या वेळांत बदल करावा, अशी विनंती केली आहे. याचा सकारात्मक परिणाम मध्य रेल्वेच्याच कार्यालयामध्ये दिसू लागला आहे. मध्य रेल्वेच्या 20% कर्मचार्यांनी या बदललेल्या वेळेचे पालन केलेले आहे. त्यामुळे गर्दी कमी होण्यास मदत झाली आहे.