दिनमान प्रतिनिधी
ठाणे।
कोरोनाकाळात लॉकडाउन आणि इतर कारणांमुळे म्हाडाने उभारलेल्या परवडणार्या घरांचा ताबा देण्यास विलंब झाल्याने कल्याण तालुक्याच्या खोणी व शिरढोण येथील लाभार्थ्यांचे आर्थिक नुकसान झाले होते. या लाभार्थ्यांचा शेवटचा 10 टक्क्यांचा हप्ता माफ करण्याची मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली होती. या मागणीला यापूर्वी तत्त्वतः मंजुरी देण्यात आली होती. नुकत्याच झालेल्या म्हाडाच्या बैठकीत या ठरावाला मान्यता देण्यात आली असून, या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले आहे. या निर्णयामुळे लाभार्थ्यांचे सुमारे 32 कोटी रुपये वाचणार आहेत. या लाभार्थ्यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आभार मानले आहेत.
म्हाडामार्फत विविध शहरांत उभारण्यात येणारी घरे ही किफायतशीर दरात नागरिकांना मिळत असतात. याच पद्धतीने म्हाडामार्फत कल्याण तालुक्यातील खोणी आणि शिरढोण तालुक्यात परवडणार्या दरातील घरे उभारण्यात आली होती. या घरांसाठीची 2018 मध्ये एक सोडत काढण्यात आली होती. तर 2021 पर्यंत विजेत्यांना घराचा ताबा देणे अपेक्षित होते. मात्र या दरम्यान आलेल्या कोरोनामुळे ही प्रक्रिया धीम्या गतीने राबविली गेली. त्यामुळे लाभार्थ्यांना घरांचा ताबा मिळाला नाही. त्याचवेळी या घरांच्या कर्जापोटी लाभार्थ्यांना बँकांचे हफ्ते भरावे लागत होते.
एकीकडे ताबा न मिळालेल्या घरांचा हप्ता तर दुसरीकडे ज्या घरात भाड्याने राहतो त्या घरभाडे अशा दुहेरी आर्थिक कोंडीत हे लाभार्थी अडकले होते. त्यातच कोरोनामुळे नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडल्याने लाभार्थ्यांचे हाल सुरू होते. या लाभार्थ्यांना दिलासा देण्यासाठी घराचा शेवटचा हप्ता माफ करण्यात यावा, अशी मागणी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी म्हाडा प्रशासनाकडे केली होती.
त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत कोकण गृहनिर्माण मंडळातर्फे नागरिकांच्या घराचा शेवटचा हप्ता माफ करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महायुती सरकारने येताच याबाबतचा सकारात्मक निर्णय घेतला.
2 हजार लाभार्थ्यांना थेट फायदा
म्हाडा प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे खोणी आणि शिरढोण प्रकल्पातील प्रत्येक विजेत्याचे 1 लाख 63 हजार रुपयांनुसार सर्व नागरिकांचे 32 कोटी 62 लाख रुपये वाचले आहेत. लाभार्थ्यांची संख्या दोन हजारांहून अधिक आहे. म्हाडाने घेतलेला हा निर्णय ऐतिहासिक आहे.