दिनमान प्रतिनिधी
कल्याण|
युक्रेनमधील एका महिलेसोबत असलेल्या अनैतिक संबंधांना विरोध केला, पण सांगूनही पती युक्रेनला गेल्याचे समजल्यानंतर पत्नीने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या प्रकरणानंतर युक्रेनवरून परतलेल्या पतीला अटक करण्यात आली आहे. नीतीश नायर असे अटक आरोपी पतीचे नाव असून, तो कल्याण (पूर्व) येथील काटेमानिवली परिसरात राहणारा आहे.
एका शिपिंग कंपनीत डेस्क मॅनेजर म्हणून नोकरी करणार्या २६ वर्षीय व्यक्तीचे युक्रेनमध्ये राहणार्या एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. तिच्या पत्नीने त्याला विरोध केला. मात्र विरोध करूनही पती गुपचूप पत्नीला न सांगता युक्रेनला गेल्याचे कळल्यानंतर २५ वर्षीय पत्नीने आत्महत्या केली.
काजलचे वडील सुरेंद्र सावंत यांनी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले की, आरोपी नीतीशवर माझ्या मुलीचे प्रेम होते. त्यामुळे दोघांचा प्रेमविवाह २०२० मध्ये झाला होता. दोन वर्षे सुखाने संसार सुरू असतानाच सप्टेंबर महिन्यात पत्नीला माहिती मिळाली होती की आपला पती नीतीशचे युक्रेनमधील एका महिलेसोबत अनैतिक संबंध आहेत. नीतीश याचे त्या महिलेसोबतचे काही फोटोही पत्नीला मोबाइलमध्ये आढळले. यामुळे तिचा संशय अधिकच बळावला.
आत्महत्या करण्यापूर्वी तिच्या काही मित्रांना मेसेज करून आत्महत्या करणार असल्याची माहिती दिल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आहे. शिवाय पत्नीने तिच्या आईला पतीकडून होणार्या आघाताची माहिती दिली होती. तसेच काजलने आपले जीवन संपवल्यानंतर, गुरुवारी तिचा पती नितीश मायदेशी परतला आणि परत आल्याची माहिती मिळताच त्याला त्याच्या राहत्या घरातून अटक केली. आरोपी पती नितीशला अटक केल्यानंतर मृत पत्नीच्या कुटुंबीय त्यांच्या मुलीचा जीव घेतल्याबद्दल त्याला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी करत आहेत.
पती गुपचूप युक्रेनला गेला
कुटुंबीयांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे की काजलला तिच्या पतीच्या अनैतिक संबंधाबद्दल कळल्यानंतर तिने त्याच्या नात्याला विरोध केला होता आणि भविष्यात युक्रेनला न जाण्याचा इशाराही पतीला दिला होता. मात्र ८ नोव्हेंबरला नीतीशने आपल्या पत्नीला सांगितले की तो काही कामासाठी बीकेसी येथील त्याच्या कार्यालयात जात आहे. पण त्याऐवजी तो युक्रेनला गेला आणि तिथून त्याने पत्नी काजलला मेसेज केला की, मी युक्रेनला पोहोचलो असून मी परत येणार नाही. तसेच तू मला विसरून जा, दुसरा मार्ग निवड, असा मेसेज आरोपी पतीने पत्नीला पाठवला. यामुळे पत्नी नैराश्यात गेली. त्यानंतर तिला खूप मानसिक त्रास झाला. यामुळे १० नोव्हेंबर रोजी ऐन दिवाळीत तिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.