विकासकामांचा उरक करताना त्यामध्ये कोणत्याही त्रुटी राहू नयेत, यासाठी अगदी छोट्या घटनांवर एकनाथ शिंदे यांचे बारकाईने लक्ष असते. केवळ ठाणे जिल्ह्यापुरते मर्यादित न राहता शिंदे यांनी राज्याच्या विविध भागांत आपल्या उत्तम कामाचा ठसा उमटविला आहे. गडचिरोलीचे पालकत्व समर्थपणे सांभाळताना तेथील नक्षली दहशत नेस्तनाबूत करण्याचे प्रयत्न त्यांनी केले. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे तेथील लोकांना विकासाच्या आणि प्रगतीच्या मूळ प्रवाहात आणण्याचे मोठे काम शिंदे यांनी केले असून, हे दखलपात्र असेच आहे. एवढ्या मोठ्या संख्येने आमदारांना एकत्र ठेवण्याची मोठी क्षमता आणि नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे, हे शरद पवार यांचे जाहीर वक्तव्य एकूणच शिंदे यांच्या नेतृत्वगुणावर ठसठशीत मोहोर उमटवते. एकूणच एकनाथ ते आता राज्याचे प्रमुख म्हणजे लोकनाथ असा झालेला शिंदे यांचा संघर्षपूर्ण प्रवास अभिमानास्पद असाच आहे.
राजकारण हे अतर्क्य असते. बुद्धिबळातील उंट हा तिरक्या चालीनेच तर हत्ती हा सरळ मार्ग स्वीकारतो. घोडे अडीच घरांची झेप घेतात आणि मोहरे एक पाऊल टाकून चाल करतात. महाराष्ट्राच्या राजकारणातील पटावरसुद्धा गुरुवारी खेळल्या गेलेल्या विलक्षण आणि अविश्वसनीय चालीने एक सर्वसामान्य शिवसैनिक आणि कार्यकर्ता आपल्यातील संयमी स्वभावाने आणि त्याला जोड असणार्या नेतृत्व गुणाने सर्वोच्च अशा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाला. नावातच एकनाथ अशी उपाधी असलेले हे सर्वमान्य व्यक्तिमत्त्व आज लोकनाथ म्हणून उदयास आले. खरेतर एकनाथ ते लोकनाथ हा प्रवास खडतर आणि आव्हानांनी भरलेला असूनही त्यावर लीलया मात करीत एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले, याबद्दल त्यांचे सर्वप्रथम विशेष अभिनंदन करणे क्रमप्राप्त ठरते. माध्यम हा लोकशाहीचा चौथा खांब असून निरपेक्षपणे या घटकाने काम करावे, ही सर्वांची अपेक्षा असते. हा नियम प्रमाणबद्ध मानून एकूणच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची योग्य दखल घेणे क्रमप्राप्त ठरते. राजकारणी हा सर्वप्रथम एक हळवा आणि लाघवी माणूस असतो, अशा नजरेने एकनाथ शिंदे यांच्याकडे पाहिले पाहिजे. विनयशील आणि शांत व्यक्तिमत्त्व हे एकनाथ शिंदे यांच्या स्वभावाचे खास वैशिष्ट्य असले तरी संघर्ष आणि आव्हाने स्वीकारण्याची धमक हे त्यांचे अंतर्भूत लक्षण आहे. सातारा जिल्ह्याच्या दरे तांबे या एका टोकावरील दुर्गम भागामधून येऊन ठाण्यात आपली स्वतःची एक खास ओळख निर्माण करण्यात एकनाथ शिंदे हे यशस्वी ठरले. कोणताही राजकीय वारसा नसताना राजकारणाच्या या अथांग महासागरात स्वतःला टिकवून सिद्ध करणे हे भल्याभल्यांना अद्याप जमलेले नाही, पण ते एकनाथ शिंदे यांनी सप्रमाण सिद्ध करून दाखवले. शिंदे हे सर्वात शक्तिशाली शिवसैनिक आणि नेते म्हणून गणले जातात. खरेतर 2019 मध्ये उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री होण्याचे मान्य केले नसते तर आज एकनाथ शिंदे त्याच खुर्चीत असते. पण हा आता इतिहास झाला. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र सरकारचे नगरविकास मंत्री होते. 1980 मध्ये त्यांनी शाखाप्रमुख म्हणून शिवसेनेत प्रवेश केला. शिंदे हे ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून चार वेळा आमदार म्हणून मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. पक्षासाठी त्यांनी तुरुंगवासही भोगला आहे. कट्टर आणि निष्ठावान शिवसैनिक अशी त्यांची प्रतिमा आहे. ठाण्यात शिंदे यांचा प्रभाव असा आहे की, लोकसभा निवडणूक असो की नागरी निवडणूक, त्यांचा उमेदवार नेहमीच जिंकतो. एकनाथ यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हेही शिवसेनेच्या तिकिटावर कल्याणमधून खासदार आहेत. 2019 मध्ये शिवसेनेने भाजपासोबतची युती तोडली आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल मात्र मुख्यमंत्री कोण होणार, याचा निर्णय होत नव्हता. निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव यांनी एकनाथ शिंदे यांची विधानसभेतील विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली. तेव्हा शिंदे यांना मुख्यमंत्री केले जाईल, असे वाटले होते. पण उद्धव यांनी मुख्यमंत्री व्हावे, असे शरद पवार आणि सोनिया गांधी यांना वाटत होते. मुख्यमंत्रिपद स्वीकारण्यासाठी उद्धव यांच्यावर कुटुंबीयांचा दबाव होता. त्यामुळे त्या वेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता होता राहिले. आनंद दिघे यांच्यानंतर ठाणे जिल्ह्यात शिवसेनेची पाळेमुळे घट्ट रोवणार्या शिंदे यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेली राजकीय युती फारशी रुचत नाही, अशी चर्चा सुरुवातीपासून असायची. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतरही भाजपा नेते तसेच संघाशी संबंधित वर्तुळाशी शिंदे यांनी निकटचे संबंध ठेवले होते. आनंद दिघे यांच्यानंतर शिवसेनेची धुरा खांद्यावर घेतलेले एकनाथ शिंदे यांनीही पक्षाचा प्रभाव अजिबात कमी होऊ दिला नाही, ही त्यांची जमेची बाजू. राजकारणापलीकडे एक संवेदनशील व्यक्ती म्हणून एकनाथ शिंदे यांच्याकडे नेहमीच पाहिले जाते. मितभाषी आणि समोरच्या व्यक्तीचे सर्व म्हणणे शांतपणे एकूण घेणे हे त्यांची खासियत. सर्वसामान्य लोकांची जास्तीत जास्त कामे करताना या लोकांना कोणताही त्रास होऊ नये अथवा अडचण येऊ नये, यासाठी शिंदे कायम दक्ष असतात. आनंद दिघे यांनी 1984 मध्ये किसननगर येथील शिवसेनेचे शाखाप्रमुख म्हणून एकनाथ शिंदे यांची नियुक्ती केली. तेव्हापासून दिघे यांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलनांमध्ये एकनाथ शिंदे यांनी भाग घेतला. संकटकाळात गोरगरीब जनतेला धान्य उपलब्ध करून देणे, टंचाईच्या काळात पामतेल उपलब्ध करून देणे, नागरी समस्यांविरोधात सरकार व प्रशासनाविरोधात केली जाणारी आंदोलने यातही एकनाथ शिंदे आघाडीवर असायचे. सन 1986 साली सीमाप्रश्नी झालेल्या आंदोलनात एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील शिवसेनेच्या 100 कार्यकर्त्यांसह भाग घेतला होता. त्या वेळी बेल्लारी येथील तुरुंगात त्यांना 40 दिवस कारावास झाला होता. समाजकारणात काम करताना त्याचा कोठेही गवगवा होऊ न देता आपले काम करीत राहणे हे शिंदे यांच्या एकूण स्वभावधर्मातच आहे. विधानसभेत विरोधी पक्षाचे आमदार या नात्याने त्यांनी अनेक समस्यांवर, राज्यापुढील महत्त्वाच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवला. ठाणेकरांच्या अत्यंत जिव्हाळ्याची असलेली क्लस्टर डेव्हलपमेंट योजना, ठाण्यासाठी मेट्रो, ठाणे आणि मुलुंडच्या दरम्यान नवे विस्तारित ठाणे स्थानक, पाणीटंचाई या ठाण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या विषयांबरोबरच सागरी सुरक्षा, पोलिस दलाचे आधुनिकीकरण, वाढती महागाई, राज्याच्या डोक्यावरील वाढते कर्ज अशा अनेक विषयांवरील त्यांची अभ्यासपूर्ण भाषणे गाजली. अनेकदा सरकारच्या घोषणा केवळ कागदावरच आहेत, हे एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळात अनेकदा आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांमधून सप्रमाण दाखवून दिले. विकासकामांचा उरक करताना त्यामध्ये कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी अगदी छोट्या घटनांवर शिंदे यांचे बारकाईने लक्ष्य असते. केवळ ठाणे जिल्ह्यापुरते मर्यादित न राहता शिंदे यांनी राज्याच्या विविध भागांत आपल्या उत्तम कामाचा ठसा उमटविला आहे. गडचिरोलीचे पालकत्व समर्थपणे सांभाळताना तेथील नक्षली दहशत नेस्तनाबूत करण्याचे प्रयत्न त्यांनी केले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तेथील लोकांना विकासाच्या आणि प्रगतीच्या मूळ प्रवाहात आणण्याचे मोठे काम शिंदे यांनी केले असून, हे दखलपात्र आहे. एवढ्या मोठ्या संख्येने आमदारांना एकत्र ठेवण्याची मोठी क्षमता आणि नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे, हे शरद पवार यांचे जाहीर वक्तव्य एकूणच शिंदे यांच्या नेतृत्वगुणावर ठसठशीत मोहोर उमटवते. एकनाथ ते आता राज्याचे प्रमुख म्हणजे लोकनाथ असा झालेला शिंदे यांचा संघर्षपूर्ण प्रवास अभिमानास्पद असाच आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे यांची झालेली निवड ही त्यांच्या आजवरच्या लोकसेवेच्या कार्याची पोचपावती आहे.