वृत्तसंस्था
पुणे।
ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नंतर त्यांना घरी आणण्यात आले होते. पुण्यातील पत्रकारनगर येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 78 वर्षांचे होते.
विविध विषयांवर लेखन करणारे प्रतिभावंत लेखक डॉ. अनिल अवचट हे ओरिगामी, लाकडी शिल्पकाम, फोटोग्राफी, चित्रकला, बासरी आदी कलांत लीलया भ्रमंती करणारे होते. सामाजिकक्षेत्रात बाबा म्हणून ते सर्वांना परिचित होते. व्यसनमुक्ती क्षेत्रातील कार्यासाठी डॉ. अवचट यांना राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी अवचट यांच्या पायावर शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर त्यांना दोन दिवसांपूर्वीच घरी आणण्यात आले होते. मात्र, गुरुवारी सकाळी त्यांची प्रकृती खालावली आणि निवासस्थानीच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात कन्या मुक्ता पुणतांबेकर आणि यशोदा वाकणकर, जावई, नातवंडे तसेच मित्रमंडळी असा मोठा परिवार आहे. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी पत्रकार नगर येथील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले होते. त्यानंतर दुपारी साडेतीन ते पावणेचारच्या सुमारास कोणत्याही धार्मिक विधींशिवाय त्यांच्या पार्थिवावर विद्युत दाहिनीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.
व्यसनींना भरकटलेल्या मार्गावरून व्यसनमुक्त करत नव्याने आयुष्य जगता यावे यासाठी त्यांनी मुक्तांगण या व्यसनमुक्ती केंद्राची सुरुवात केली होती. अवचट यांनी आपल्या पत्नी डॉ. सुनंदा अवचट यांच्या सहकार्याने व्यसनमुक्तीची शोधलेली अनोखी पद्धती ही जगभरातील अनेक व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये वापरली जाते. मुक्तांगण परिवारातर्फे दरवर्षी डॉ. अनिता अवचट स्मृती संघर्ष सन्मान पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार मिळविणार्यांमध्ये पारोमिता गोस्वामी, गिरीश लाड, आबा महाजन, पुण्याचे पार्किन्सन मित्रमंडळ, चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे, प्रमोद उदारसारख्या मान्यवरांचा समावेश आहे. डॉ. अनिल अवचट हे स्वतः पत्रकार होते तरी त्यांनी पत्रकारितेतील व्यावसायिकता नेहमीच नकार दिला.
बिहारमधील एस. एम. जोशी यांच्यासोबत केलेल्या प्रवासावर पूर्णिया हे त्यांचं पहिलं पुस्तक 1969 साली प्रकाशित झाले. कोंडमारा हा दलित अत्याचारांवरील लेखांचा त्यांचा संग्रह विशेष गाजला, तर ‘माणसं’ या पुस्तकाव्दारे त्यांनी हमाल, विडीकामगार, वैदू यांच्या सामाजिक जीवनाचा लेखाजोखा मांडला. कार्यरत, छंदांविषयी, स्वत:विषयी, गर्द, पुण्याची अपूर्वाई, सृष्टीत गोष्टीत आणि सुनंदाला आठवतांना ही त्यांची पुस्तकंही विशेष गाजली. त्यांची 38 हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. महाराष्ट्र फाऊंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार आणि महाराष्ट्र राज्य वाङ्मय पुरस्कारासह प्रतिष्ठेचे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले.