दिनमान प्रतिनिधी
ठाणे|
मेरी माटी मेरा देश अर्थात माझी माती माझा देश यातील वीरांना वंदन. देशासाठी बलिदान देणार्या शूरवीरांना समर्पित अमृतकलश यात्रेचा प्रारंभ गुरुवारी महापालिका कार्यक्षेत्रात आयुक्त अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. या दुसर्या टप्प्यात ठाणे महापालिकेच्या विविध प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील नागरिकांकडून अमृतकलशामध्ये माती किंवा तांदूळ गोळा करण्यात येणार आहे.
नौपाडा प्रभाग समिती हद्दीत अमृतकलश यात्रा काढून घराघरातून माती व तांदूळ जमा करण्यात आले. या यात्रेत ठाणे महापालिकेचे अधिकारी कर्मचारी, लोकप्रतिनिधी, टीडीआरएफचे जवान, सुरक्षारक्षक तसेच शाळांमधील स्काऊट गाइडचे विद्यार्थी सहभागी झाले होते. या अमृतकलश यात्रेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
नौपाडा प्रभाग समितीअंतर्गत काढलेल्या या यात्रेत अतिरिक्त आयुक्त २ प्रशांत रोडे, उपायुक्त जी. जी. गोदेपुरे, उपायुक्त शंकर पाटोळे, परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहेरे, माजी नगरसेवक संजय वाघुले, माजी नगरसेविका नम्रता कोळी, प्रतिभा मढवी सहभागी झाले होते.
मासुंदा तलावाभोवती काढण्यात आलेल्या या अमृतकलश यात्रेत घोडागाडी, अग्शिनशामक दलातील वाहने, रुग्ण्वाहिका, आपत्कालीन विभागाची वाहने सहभागी झाली होती. अमृतकलश ३० सप्टेंबरपर्यत महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व प्रभाग समित्यांतर्गत फिरणार आहे. या कलशात जमा झालेली माती व तांदूळ ठाणे महापालिका मुख्यालयाच्या माध्यमातून २७ ऑक्टोबर २०२३ रोजी ऑगस्ट क्रांती मैदान, मुंबई येथे पाठविण्यात येणार आहे.