दिनमान प्रतिनिधी
मुंबई।
दिवाळीनंतर आता लग्नसराईचा हंगाम जोरात सुरू होणार आहे. वधू आणि वराच्या कपडे खरेदीपासून पाहुण्यारावळ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर खरेदी होणार आहे. देशभरात लग्नाच्या याच हंगामातून अंदाजे 4.25 लाख कोटी रुपये खर्च होतात. यंदा दिवाळीनंतर अवघ्या 23 दिवसांचा लग्नाचा हंगाम आहे. या काळात देशात देशात प्रत्येक सेकंदाला 21.37 लाख रुपये खर्च होणार आहेत.
कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचा अंदाज आहे की, 23 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीत एकूण विक्री सुमारे 4.25 ट्रिलियन रुपये (51 अब्ज डॉलर) असेल. म्हणजेच या कालावधीत प्रत्येक सेकंदाला लग्नाच्या खरेदीवर 21.37 लाख रुपये खर्च होतील. नोव्हेंबरच्या अखेरीस व डिसेंबरच्या मध्यापर्यंत देशात 35 लाखांहून अधिक विवाह होणार आहेत.
मेटल्स फोकस लि.चे प्रमुख सल्लागार चिराग शेठ यांच्या माहितीनुसार, ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत विक्री गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगली असेल. इस्रायल-हमास युद्धामुळे किमती वाढल्याने लग्नाच्या दागिन्यांच्या मागणीवरही फारसा परिणाम होणार नाही. भारतीय लोक लग्नाच्या दागिन्यांसाठी बचत करीत असतात. किमती दोन टक्के किंवा तीन टक्के वाढल्या तरी त्याचा फारसा परिणाम होणार नाही.
रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे सीईओ कुमार राजगोपालन यांना दागिने, कपडे, शूज व डिझायनर कपडे यांसारख्या लग्नखर्चाशी संबंधित व्यवसाय विक्री नोव्हेंबर ते जानेवारीअखेरीस 8 ते 11 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे. महागाईतही लग्न हंगामाच्या पहिल्या आठवड्यात चांगला व्यवसाय अपेक्षित आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचा अंदाज आहे की 23 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीत एकूण विक्री सुमारे 4.25 ट्रिलियन रुपये (51 अब्ज डॉलर) असेल. या काळात सोने, भेटवस्तू देणे शुभ मानले जाते. कुटुंबे त्यांच्या लग्नाच्या बजेटचा मोठा भाग दागिन्यांवर खर्च करतात.
देशात सोन्याची वार्षिक मागणी सुमारे 800 टन इतकी आहे. त्यातील निम्म्याहून अधिक खरेदी लग्नासाठी केली जाते. भारत हा जगातील दुसर्या क्रमांकाचा सोन्याचा ग्राहक असलेला देश आहे. टायटन कंपनीच्या तनिष्क, सेन्को गोल्ड लिमिटेड, त्रिभोवन दास भीमजी झवेरी लि. आणि कल्याण ज्वेलर्स इंडिया लि. यांना या काळात मोठा फायदा होणे अपेक्षित आहे.