दिनमान प्रतिनिधी
ठाणे।
साखरेचे खाणार त्याला देव देणार, अशी म्हण प्रचलित असली तरी सध्या मधुमेहाच्या युगात साखरेवर जो तो नियंत्रण राखू लागला आहे. त्यातून साखरेला पर्याय म्हणून अनेक जण गुळाची निवड करतात. गुळात कृत्रिम खाद्य रंगाचा वापर होत असल्याने गुळाचे पदार्थ किंवा औषधी मात्रा असल्याने चाखली जाणारी भेसळयुक्त गुळाची चव आरोग्यास बाधक झाली आहे.
कोल्हापूर, सांगलीतील काही गूळ उत्पादकांना प्रत्येकी पाच लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. झटपट चांगला नफा मिळविण्यासाठी गुळात कृत्रिम खाद्य रंगाचा वापर करणार्या सांगली आणि कोल्हापूर येथील उत्पादकांना चांगलेच महागात पडले आहे. या दोन्ही उत्पादकांना अन्न व औषध प्रशासन विभागाचे कोकण विभाग सहआयुक्त (अन्न) तथा न्यायनिर्णय अधिकारी सुरेश देशमुख यांनी प्रत्येकी पाच लाखांचा दंड ठोठावला आहे.
सर्व तपासण्यांनंतर या गुळात कृत्रिम खाद्य रंगाची भेसळ केल्याचे विश्लेषणाअंती सिद्ध झाल्याने कोल्हापूरच्या मेसर्स ई. एच. काथवाला आणि कंपनी, सांगलीच्या मेसर्स सत्यविजय सेल्स कॉपोर्रेशन या दोन गूळ उत्पादकांना प्रत्येकी पाच लाख रुपये इतका दंड 30 सप्टेंबर 2022 रोजी ठोठावण्यात आला आहे.
अन्न सुरक्षा व मानके कायदा, 2006 हा कायदा जनहित व जनआरोग्याच्या दृष्टिकोनातून 5 ऑगस्ट 2011 पासून महाराष्ट्रासह संपूर्ण देशात लागू झाला. सर्वसामान्य जनतेस सकस, निर्भेळ आणि सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध करून देणे हाच या कायद्याचा मुख्य उद्देश आहे. नवी मुंबईतील वाशी येथील घाऊक बाजारपेठेमध्ये कोल्हापूर आणि सांगलीच्या उत्पादकांनी गुळाची विक्री केली होती. याच गुळाची तपासणी कोकण विभागाच्या अन्न व औषध प्रशासनाने जानेवारी 2021 मध्ये केली होती.
अन्न सुरक्षा व मानके कायदा, 2006 अंतर्गत तरतुदींचे उल्लंघन केल्याप्रकरणी एप्रिल ते सप्टेंबर 2022 या कालावधीत 170 प्रकरणे दाखल झाली. त्यातील 160 प्रकरणांचा अंतिम निकाल लागला. त्यात 70 लाखांपेक्षा जास्त दंड या कायद्याचे उल्लंघन करणार्या व्यापार्यांना ठोठावण्यात आला आहे.
गुळाला मागणी वाढल्यामुळे त्यात चॉकलेट किंवा कृत्रिम रंग मिसळले जातात. याच रंगामुळे कर्करोगासारख्या आजारांचाही धोका होण्याची भीती असते. त्यामुळेच भेसळ करणार्यांना जरब बसावी म्हणून मोठ्या दंडाची तरतूद आहे. त्यामुळे कोणत्याही अन्न पदार्थाचा दर्जा आणि गुणवत्ता याबाबत शंका असल्यास त्याची तक्रार अन्न औषध प्रशासनाच्या 1800 – 222 – 365 या टोल फ्री क्रमांकावर करण्यात यावी, असे आवाहन
सुरेश देशमुख, सहआयुक्त (अन्न), कोकण विभाग, अन्न व औषध प्रशासन यांच्याकडून करण्यात आले आहे.
आहारात साखरेचे प्रमाण कमी असावे याची सर्वसामान्यांना आता जाणीव होऊ लागली आहे. यामुळे साखरेला पर्याय म्हणून अनेक जण गुळाची निवड करतात. सद्यःस्थितीत बाजारात साखरेपेक्षा गुळाची किंमत तुलनेने अधिक आहे. ग्राहकांचा गुळाच्या खरेदीकडे असलेला कल व गुळाची साखरेपेक्षा जास्त असलेली किंमत या बाबी विचारात घेता, गुळाचे उत्पादन करताना काही उत्पादक गुळामध्ये साखर, चॉकलेट आणि कृत्रिम रंग यांचा वापर करणे यासारख्या गैरकायदेशीर मार्गाचाही अवलंब करीत आहेत.